Ticker

6/Breaking/ticker-posts

मुख्य निवडणूक अधिकारी यांना मतदार जनजागृतीचा आराखडा सादर



लोकनेता  न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहिल्यानगर दि.14- विधानसभा निवडणूक ही लोकशाही बळकट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून या प्रक्रियेत मतदारांचे  योगदान महत्वाचे आहे. जिल्हा स्वीप समितीचे विविध नियोजित उपक्रम हे निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निश्चितच सहाय्यभूत ठरतील, असे प्रतिपादन   जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने अहिल्यानगर जिल्हा स्वीप समितीच्यावतीने मतदान जनजागृतीसाठी राबवावयाच्या विविध उपक्रमांचा आराखडा जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून नुकताच मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांना सादर करण्यात आला. मतदारांचे नियोजनबद्ध  शिक्षण आणि निवडणूक सहभागावर आधारीत विविध उपक्रमांचा यात समावेश आहे.

 यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी गजानन नकासकर, तहसीलदार शरद घोरपडे , डॉ.अमोल बागुल तसेच स्वीप समिती सदस्य उपस्थित होते.

लोकशाहीला समृद्ध करणाऱ्या मतदान प्रक्रियेतील विविध नाविन्यपूर्ण उपाययोजना देखील येत्या काळामध्ये प्रभावी ठरून निर्भयपणे व निरपेक्षवृत्तीने मतदान करण्यासाठी मतदारांना प्रोत्साहित करतील असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला. महिला, नवमतदार यांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी विशेष उपक्रम आयोजित करावे, अशी सूचनाही श्री.सालीमठ यांनी केली.

 भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, स्वीप समन्व्यक अधिकारी अशोक कडूस आणि  भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली   तयार झालेल्या स्वीप आराखड्यामध्ये मतदार जनजागृतीसाठी रॅली, शोभायात्रा, मिरवणूक, सेल्फी पॉइंट, पथनाट्य , विविध प्रकारच्या स्पर्धा तसेच नव मतदार नोंदणी, दिव्यांग, तृतीयपंथी तथा वंचित घटकातील महिलावर्ग यांच्यासाठी विशेष उपक्रम , ईव्हीएम व व्हीव्हीपॅटविषयक जनजागृती शिबिरे, मतदार जनजागृती शपथ, संकल्पपत्र, सायकल रॅली,दृकश्राव्य निर्मिती ,मतदार जनजागृतीसाठी समाजमाध्यमांचा वापर,जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद ,लोकशाही दौड आदी विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या