Ticker

6/Breaking/ticker-posts

कर्मवीरांनी शिक्षणाला समता आणि कार्यशीलतेची नीती दिली : डॉ. कैलास दौंड




 

लोकनेता न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

कोरडगाव : बहुजनांना समानतेने शिक्षण देण्यासाठी सत्यशोधक समाजाचे मोठे योगदान असुन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षणाची गंगा आणली, त्यामुळेंच सामाजिक समता प्रस्थापित होऊ शकली, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ कैलास दौंड यांनी व्यक्त केले.


      पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३७  वी जयंती शनिवारी उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे  होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध साहित्यिक डॉ. ‌कैलास दौंड हे होतें. 'आठवणींचा डोह'कार शब्दगंध साहित्यिक परीषदेचे संस्थापक, सचिव सुनील  गोसावी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमास उपस्थित होते. प्रारंभी न्यू इंग्लिश स्कूल कोरडगावचे मुख्याध्यापक सुनील ठुबे यांनी सर्वांचे स्वागत केले. 


    यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना ज्ञानदेव पांडुळे  यांनी रयत शिक्षण संस्थेच्या स्थापने मागील पार्श्वभूमी सांगितली आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचे वेगळेपण, मोठेपण अधोरेखित केले. 

         कवी डॉ. ‌कैलास दौंड पुढें बोलतांना म्हणाले की, 'बहुजनांना समानतेने शिक्षण देण्यामध्ये सत्यशोधक समाजाचे मोठे योगदान असुन महात्मा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी श्रमाला प्रतिष्ठा देणारे,समानता प्रस्थापित करणारे आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करणारे शिक्षण कसलाही भेदभाव न करता समाजाला दिले. कर्मवीरांनी शिक्षणाला समता आणि कार्यशीलतेची नीती दिली.


यावेळी डॉ. कैलास दौंड यांनी इयत्ता आठवीच्या पाठ्य पुस्तकात असलेल्या त्यांच्या 'गोधडी' या कविते विषयी सांगून कर्मवीर भाऊराव पाटलांच्या जीवन कार्यावर लिहीलेली 'कर्मवीरा...' ही कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. 'नानीच्या तिरावर' , ' आस बाळगणारी म्हातारी', 'ढव्हं'  या कविताही त्यांनी मनोगतात सादर केल्या. शब्दगंधचे संस्थापक सुनील गोसावी यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.थोर देणगीदार रयत सेवक मुखेकर यांनी विद्यालयाला सीसीटीव्ही सेटअप देणगी म्हणून दिला. तर विद्यालयाच्या  हिंदी विषयाच्या माजी अध्यापिका रंजना थोरात यांनी विद्यालयाला 11,000 रुपयाची रोख देणगी दिली. अकबरभाई शेख, बबन किलबिले ,अशोकराव हाडोळे यांनी गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले.अर्जुनराव मुखेकर यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह दिले. यावेळी विद्यार्थ्यांनींची प्रातिनिधिक भाषणे झाली. कार्यक्रमास  नारायण देशमुख, नारायण काकडे,त्रिंबक देशमुख, सात्रळचे मुख्याध्यापक राजु बडे , भानुदास केदार मेजर, युवानेते स्वप्नील देशमुख, बाबासाहेब किलबिले, अशोक कांजवणे, गहिनीनाथ बोंद्रे, चेमटे मेजर, गायकवाड सर, दत्ता केदार आणि पालक,शिक्षक उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी पाखरे व श्रीमती वावधने , श्रीम. ठोंबरे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तिवारी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. गुटाळ यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या