Ticker

6/Breaking/ticker-posts

एकदा संधी देऊन तर बघा, दुष्काळी पट्टा जलयुक्त करून दाखवितो : प्रतापराव ढाकणे

 





लोकनेता न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

बोधेगाव-(विक्रम केदार)पाथर्डी -शेवगाव तालुक्यातील प्रस्थापितांच्या कारखाना परिसरात  मुबलक पाणी आहे, मात्र केदारेश्वर परिसराला पाण्यासाठी कित्येक वर्षांपासून संघर्ष करावा लागत आहे, दुष्काळी पट्ट्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी माझ्याकडे नकाशा तयार असून एकदा संधी द्या, या भागातील पाण्याचा प्रश्न सोडून दाखवितो असे प्रतिपादन केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रतापराव ढाकणे यांनी केले. 
    
 संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सन 2024-2025 च्या मील रोलरच्या पूजन समारंभात ते बोलत होते. यावेळी जि. प.च्या माजी सदस्य प्रभावती ढाकणे, कारखान्याचे उपाध्यक्ष माधवराव काटे, संचालक डॉ. प्रकाश घनवट, रणजीत घुगे, त्रिंबकराव चिमटे, बाळासाहेब फुंदे, मोहन दहिफळे, तालुका अध्यक्ष हरीश भारदे, कार्यकारी संचालक रमेश गरजे, प्रशासकीय अधिकारी पोपटराव केदार, मुख्य अभियंता प्रवीण काळुसे, मुख्यालेखापाल तीर्थराज घुंगरट, रामनाथ पालवे , राजेंद्र केसभट आदी उपस्थित होते. 

     पुढे बोलताना ढाकणे म्हणाले,मागील तीस वर्षांपासून आपण शेवगाव- पाथर्डीतील जनतेसाठी अविरतपणे संघर्ष करत आलो आहे . वेळोवेळी जनतेची आपल्याला साथ मिळाली. यावर्षीची लढाई मात्र आरपारची असेल मला आमदारकीचा हव्यास नाही, मी तुमच्यासाठी लढतोय, कारण बोधेगाव परिसराला पाण्याच्या समस्येपासून कायमचे सोडवायचे आहे. शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागला तर परिसर उजळतो. लोकांचे जीवनमान उंचावते. त्यामुळे पाण्यापासून वंचित असलेल्या गावांना पाणी आणण्यासाठी मला पाच वर्षे आमदारकी पाहिजे. शेतीच्या पाण्यासाठी गोरेगाव परिसर कसा योग्य आहे. याचा रोड मॅप माझ्याकडे तयार असून पाच वर्षात या परिसराला जलयुक्त करून टाकू, असा ठाम निर्धार व्यक्त केला. 

 स्वर्गीय बबनराव ढाकणे यांनी बोधेगाव परिसरावर अत्यंत प्रेम केले. मात्र मागील 25 वर्षांपासून या परिसरात विकासाचे एकही ठोस काम झाले नाही, केवळ रस्ते बांधले म्हणजे विकास होत नाही, खरा विकास काय आहे ? हे आपल्याला त्यांना दाखवून द्यायचे आहे. त्यासाठी तुमची साथ महत्त्वाची आहे.  केदारेश्वर कारखान्याला अडचणीत आणण्यासाठी अनेकांनी वेळोवेळी प्रयत्न केले. मात्र आपण खंबीरपणे ठाम भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिलो. एक वेळ माझी संपत्ती गहाण ठेवून मी कारखाना वाचविला. मात्र शेतकऱ्यांना दुसऱ्यांच्या दारात जाऊ दिले नाही.  कारण हा ऊस तोडणी कामगारांचा एकमेव कारखाना आहे. यापुढेही आपण सर्वांनी कारखाना वाचविण्यासाठी व पाण्याचा लढा निर्माण करण्यासाठी येणाऱ्या काळात मला साथ द्या,  आणि हे सर्व कसे मिळत नाही, ते मी पाहतो,  तुम्ही फक्त माझ्या पाठीशी उभे रहा, असे आवाहन ढाकणे यांनी शेवटी केले. प्रस्ताविक शरद सोनवणे यांनी केले तर आभार माजी संचालक बाळासाहेब कांबळे यांनी मानले.

काका हे प्रस्थापितांचे नव्हे, विस्थापितांचे नेते 
 
यावेळी बोलताना जि. प. माजी सदस्य प्रभावती ढाकणे म्हणाल्या की,  आपापसातील मतभेद बाजूला सारून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील दुष्काळी भागांना फक्त प्रताप काकाच  पाणी आणू शकतात, त्यासाठी काकांना विधानसभेत  पाठविणे नितांत गरजेचे आहे. जवळपास शेवगाव अर्धा आणि पाथर्डी संपूर्ण तालुका दुष्काळी असल्यामुळे येथील लाखो शेटकरी, शेतमजुरांना ऊसतोडणीसाठी दरवर्षी जावे लागते.  त्यांचा कोयता बंद करायचा आहे. त्यामूळे काका हे  प्रस्थापितांचे नव्हे, तर  विस्थापितांचे नेते आहेत. गेली 30 वर्षांपासून अविरत संघर्ष करत संघर्षातून निर्माण झालेले  हे नेतृत्व आहे. ते शेवगाव-पाथर्डी तालुक्याच्या विकासाचा अनुशेष नक्कीच भरून काढू शकतात,  त्यामुळे दोन्ही तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी,  कामगार,  उपेक्षितांनि काकांना मतदानरुपी पाठबळ द्यावे,  असे आवाहन केले. 
     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या