लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई: राज्यात करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी १ जूनपर्यंत लॉकडाऊन
वाढवण्यात आला आहे. हा लॉकडाऊन त्यापुढेही वाढवला जाणार का, याकडे
आता सर्वांचे लक्ष लागले असताना राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे.
त्याचवेळी संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सरकार पातळीवर कशा हालचाली
सुरू आहेत याची माहितीही त्यानी दिली.
राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत
असल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रुग्णसंख्येत घट होत
आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ९० टक्क्यांच्या पुढे गेले आहे. या
अनुषंगाने राज्यात १ जूनच्या पुढेही लॉकडाऊन वाढवला जाणार का, अशी विचारणा केली असता आदित्य यांनी
त्यावर विस्तृत उत्तर दिले. लॉकडाऊन वाढवला जाणार किंवा नाही, हे पूर्णपणे राज्यातील करोना रुग्णसंख्येवर अवलंबून असेल. मे महिन्याच्या
शेवटच्या आठवड्यात तेव्हाच्या स्थितीचा आढावा घेऊन पुढचा निर्णय सरकार घेईल.
त्यातही नागरिकांच्या आरोग्यालाच पहिलं प्राधान्य असेल व त्यानुसारच पुढचा निर्णय
होईल, असे आदित्य यांनी सांगितले. राज्यात सध्या लॉकडाऊन
असला तरी अर्थचक्र मात्र सुरू आहे. प्रमुख कार्यालये, उद्योगधंदे,
आयात-निर्यात यावर कोणतीही बंधने घालण्यात आलेली नाहीत. केवळ
अनावश्यक गोष्टींसाठी जे घराबाहेर पडतात त्यांना अटकाव करण्यात आलेला आहे.
त्यामुळे अनावश्यक कारणासाठी घराबाहेर कधी जाता येणार, असा तुमचा
प्रश्न असेल तर रुग्णसंख्या नियंत्रणात आल्यानंतरच, हे
त्यावर उत्तर असल्याचे आदित्य म्हणाले.
राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात
करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या लाटेचा मुकाबला कसा
करायचा, याची तयारी
आतापासूनच सुरू करण्यात आली आहे. याबाबत कोविड टास्क फोर्स मार्गदर्शन करत आहे.
यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,
उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे
यांच्यात सातत्याने चर्चा होत आहे. यावर अनेक बैठकाही झाल्या आहेत. या लाटेचा मोठा
फटका बसू नये यासाठी लसीकरण वाढवण्यावरही भर दिला
जात आहे. आजच राज्याने लसीकरणाचा दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. दुसरीकडे आरोग्य
सुविधा वाढवण्यासाठीही पावले टाकली जात आहेत, असे आदित्य
यांनी सांगितले. सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
0 टिप्पण्या